Sunday, September 27, 2009

हसत जावे जाताना

रडतच आलो येताना,पण हसत जावे जाताना

अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे,तृषित धरित्री न्हाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

हसत हसत ज्योई जळली
काळोखाची रात्र उजळली
पाहत झाली तेव्हा नव्हती,तेजोमय जग होताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

बीज आतुनी फुटून गेले
वेदनेत या फुल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे,मरण झेलुनी घेताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

कुणी दुखाचा घोट घेतला
खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दुखाचे झाले गाणे,जीव उधळूनी जाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

कृपा


ज्या क्षणी माझं बाळ
पहिला पाउस झेलून आलं,
त्या क्षणी माझं र्हुदय
आभाळाशी बोलून आलं:

''आभाळा,आभाळा
अशीच कृपा राहू दे;
असेच शंभर पावसाळे
माझं बाळ पाहू दे!''

दिवाळी..


ज्याच्या घरी
अंधार असेल,
अश्रुवाचून काहीच नसेल,त्याच्या घरी
एकदा तरी
एक दिवा लाव!

तेल नाही,
वात नाही;
आधाराचा हात नाही;
त्याच्या घरी
एकदा तरी
एक दिवा लाव!

नवा दिवस

भिऊन पावलं टाकू नका,
भिऊन डोळे झाकू नका!
भिनार्याला
प्रकाश कोणी बघू देत नाहीत;
भिनार्याला
इथे कोणी जगू देत नाहीत!

गरुडाहुन झेपावणारा
प्रत्येकाला प्राण आहे;
विश्वास ठेवा ,तुमच्या पायात
न संपणारं त्राण आहे!


विश्वास ठेवा,
विश्वास ठेवा,

नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे,
नवा दिवस विकास घेऊन येतो आहे..

सोबत...


अवतीभोवती कोणीच नसेल,
काळाकुट्ट काळोख असेल!
पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही,
'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही!
प्रत्येक पाउल हरलेले,
जग उलट फिरले!

शरण न जाण्याची
हीच वेळ असते;
आपले आपण असण्याची
हीच वेळ असते!

अशा वेळी छातीवरती
ठेवा आपला हात,
''भिऊ नको!मी आहे!''
म्हणेल कोणी आत!

आशेवर जीवन तरते रे...

ही रात्र कधीतरी सरते रे
आशेवर जीवन तरते रे

सुकलेल्या फांदीवर येती नवीन पाने
आणि वाटते तसे जगावे पुन्हा नव्याने
जळ पुन्हा ढगातून भरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे

उजाड झाल्या मालावर वासंतिक वारे
आणि अचानक अंधारावर झुलती तारे
मौनातून गाणे झरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे

काळोखाच्या काठावरती तांबूस चाहूल
रत्नांच्या पाण्यात उषेचे भिजते पाउल
प्राणात पाखरू स्फुरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे........

जगणे म्हणजे उधळीत जाणे ........

आत आपुल्या झरा झुळझुळे निळा स्वच्छंद,
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद.

घनधारांतून ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळीत मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

दु:खाला आधार नको का?तेही कधीतरी येते
दोस्त होवुनी हातच माझा अपुल्या हाती घेते
जो जो येईल त्याचे स्वागत दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हसे
सर्वत्रच तो बघतो धुंदी,डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार
हात होतसे वाद्य:सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद.

Tuesday, September 22, 2009

गाणं जगण्याचं!

मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?
जीव जडून प्रेम करायचं कोणी थांबतं का?

कशासाठी भयाने ग्रासून जायचं?
फुलायच्या प्रत्येक क्षणी नसून जायचं?

सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

फुलून येते संध्याकाळ,रंगांची बाधा होते!
निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते!

पाउस फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

ठुमरीच्या अंगाने झरा जेंव्हा वाहू लागतो.
लाल केशरी सरगम जेंव्हा फांदीवरून गाऊ लागतो!

झाडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

येणार असेल मरण तेव्हा येवू द्यावं
जमलाच तर लाडाने जवळ घ्याव!

हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

Sunday, September 20, 2009

अशी पाखरे येती आणिक स्मृती...

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत सांगत,दोन दिसांची नाती.

चंद्र कोवळा पहिला वाहिला झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जय उजळूनी काळोखाच्या राती

फुलून येत फुल बोलले,मी मरणावर र्हुदय तोलले
नव्हते नंतर,परी निरंतर,गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला,पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या र्हुदायांची गाठ,सूर अजूनही गाती...

मी फुल तृणातील इवले..

जरी तुझिया सामर्थ्याने
धलतिल दिशाही दाही
मी फुल तृणातील इवले..
उमलणार तरीही नाही

शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तरुणाचे पाते
अन स्वतःस विसरून वर
जोडील रेशमी नाते

कुरवाळत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करितील सजल इशारा

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे
अन रंगांचे गंधाचे
मी गीत कसे गुंफावे?

शोधीत धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदू सजल सुगंधित हेतू!

तू तुलाच विसरून यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे.... m>

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून
तुमची आठवण
कोणीतरी काढतच ना?
उन उन
दोन घास
तुमच्यासाठी वाढतच ना?

शाप देत बसायचं
कि दुवा देत हसायचं?
तुम्हीच ठरवा?

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसत,
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेवून उभ असत?

काळोखात कुढायचं
कि प्रकाशात उडायचं?
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असत;
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसत?

काट्यासारखं सलायचं
कि फुलासारखं फुलायचं?
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!